बहुजननामा ऑनलाइन टीम – मराठ्यांचा इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा, तसेच नवीन माध्यमांचा अधिकाधिक(history of Marathas ) वापर करुन कसोशीने प्रयत्न करायला हवेत, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे. भांडारकर प्राच्यविद्या संसशोध मंदिर संस्थेतर्फे डॉ. केदार फाळके यांच्या ‘छत्रपती संभाजी महाराजांची राजधानी’ या ग्रंथाचे प्रकाशन रामराजे नाईक-निंबाळक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, लेखक डॉ. केदार फाळके उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘बुधभूषण’ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, संशोधनाची प्रक्रिया सुरु राहिली पाहिजे. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर विकसित झालेल्या समाजमाध्यमाद्वारे आपण इतिहास जगामध्ये नेला पाहिजे. तर ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती सांगणारा हा ग्रंथ आहे. नवीन पिढीसाठी अशा स्वरूपाच्या संशोधनात्मक ग्रंथाचे लेख होणे गरजेचे असल्याचे मत बलकवडे यांनी व्यक्त केले.
लेखक डॉ. केदार फाळके यांनी पुस्तक लेखना मागची भूमिका मांडली तर पटवर्धन यांनी या पुस्तकाची लवकरच इंग्रजी आवृत्ती प्रकाशित केली जाणार असल्याचे सांगितले. श्रीनंद बापट यांनी सुत्रसंचालन केले.