पुणे : बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारने केलेले शेतीविषयक जाचक विधेयके मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून वारजे महामार्ग उड्डाण पुलाखाली महाविकास आघाडी आणि समविचारी संघटनांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. वारजे भागातील पक्षीय, समविचारी संघटना यांनी आज सकाळी साडेदहा वाजता निदर्शने आंदोलन केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक सेल पुणे उपाध्यक्ष जावेद शेख, प्राची दुधाणे, युवक कॉंग्रेस अध्यक्ष सचिन बराटे व शिवसेना वारजे अध्यक्ष अजय पोळ यांनी या आंदोलनाचे संयोजन केले. आंदोलनात विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, जिल्हा परिषद सदस्य इंगळे, नगरसेवक सचिन दोडके, जावेद शेख, श्रीकृष्ण बराटे, बाबा खान, अॅड. विठ्ठल वांजळे या सर्वांनी सहभाग घेऊन आपले मत प्रदर्शन केले व निषेध आंदोलनाला मार्गदर्शन केले.
या आंदोलनात पंतप्रधान मोदी तसेच भाजप सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. मोदी सरकार हाय हाय, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय, वापस लो, वापस लो, काला कानून वापस लो अशा घोषणाबाजीने आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. जावेद शेख व देवेंद्र सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले, तर सायली वांजळे यांनी आभार मानले. पुण्यात “किसान बाग” सुरू करण्याची माहिती जावेद शेख यांनी दिली आणि शेवटी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
1. दिलीप बराटे (माजी विरोधी पक्षनेते )
केंद्र सरकारद्वारे केलेल्या शेतीविषयक जाचक कायद्याला कडक विरोध करण्यासाठी वारजे येथे राष्ट्रवादी, जनता दल, शिवसेना आदी सर्व मित्र पक्ष एकत्र आलो आहोत. पक्षाच्या आदेशानुसार लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन केले गेले आहे. हा काळा कायदा रद्द झालाच पाहिजे, असे मत बराटे यांनी व्यक्त केले.
2. दीपाली धुमाळ (विरोधी पक्षनेता, पुणे महानगरपालिका )
केंद्र सरकारद्वारे जाचक विधायक आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा आम्ही विरोध करत आहोत. मोदी सरकार फक्त भांडवलशाही करून मोठमोठ्या कंपन्यांचा फायदा बघत आहे. एसीत बसणाऱ्या लोकांना शेतक-यांच्या व्यथा कधीच समजणार नाहीत.