पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यात अजून तीन दिवस दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह काही भागात पावसाच्या सरी कोसळतील, असा इशारा हवामान विभागाने सोमवारी दिला आहे. तर गेले दोन दिवस शहरात काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. सलग दुसऱ्या दिवशी शहरातील वातावरण काही वेगळे झाले असून, शहरात दुपारपर्यंत कडक ऊन आणि त्यानंतर ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथे सायंकाळी साडेपाच दरम्यान ०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर येत्या दोन दिवसात आकाश प्रामुख्याने ढगाळ होऊन दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेने वर्तविली गेली आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी गारांसह अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. तर पुणे, नाशिक जिल्ह्यातील काही भागांत सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला आहे. आणि मराठवाडा व विदर्भात मागील ३ दिवस या पाऊसाने चांगलंच नुकसान झालं आहे. याबरोबरच मध्य महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचं प्रमाण वाढलं आहे. सोमवारी सकाळपासून अंशतः ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वाढलेला उन्हाचा पारा काही प्रमाणात कमी झाला आहे. आणि कमाल तापमानातही घेत झाली आहे. सोमवारी दुपारनंतर अचानक पुणे परिसरात जोरदार पाऊसाने झोडपले असून, शिरूर, भोर, खेड, पुरंदर या भागातही व पुणे शहराच्या उपनगरातही ढगाळ हवामान आणि वातावरण होते.
आज गारांसह पाऊसाचा इशारा –
मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भाग ते कर्नाटकाची किनारपट्टी या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. यामुळे आज मंगळवारी (दि .२३) मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांत पुन्हा गारांसह पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणार असून विजांच्या कडकडाट व ढगाळ वातावरणात जोरदार पाऊस पडेल. तर मंगळवारी जिल्ह्यांत तुरळक सरी पडणार असून गुरुवारपासून (ता. २५) राज्यात ढगाळ वातावरणाचा प्रभाव कमी होणार आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.