पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना महामारीचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. तरीसुद्धा बेशिस्त नागरिक अनावश्यक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन न करणे अशा कारणांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यासाठी नागरिकांनीच कामाशिवाय घराबाहेर पडणे थांबवणे स्वतःबरोबर देशवासियांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे, अशी भावना वैद्यकीय अभ्यासकांनी व्यक्त केली.
शहर-उपनगर आणि परिसरातील वस्ती, सोसायटी परिसरात नियमांचे जास्त उल्लंघन केले जात आहे. खेळात मग्न असलेली लहान मुले मास्क काढून टाकतात. तरुण मास्क सोबत घेतात, पण तो हनुवटीला लावतात. पावती करताना पालिका कर्मचारी व तरुणांमध्ये वादावादी होते, मजूर लोकांकडूनही अनावधनाने दुर्लक्ष होत आहे, ही बाब स्वतःबरोबर कुटुंबीय आणि देशवासियांसाठी घातक आहे. मागिल वर्षभरापासून आपण कोरोनाशी दोन हात करीत आहोत. आता त्यावर औषधोपचार आले आहेत, त्यामुळे प्रत्येकाने कोरोनाला हरवण्यासाठी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.
पुण्यात कोरोनाच्या संक्रमनामुळे दररोज सुमारे ४ हजारांच्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नाही, बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही, अशी निर्माण झाली आहे. पुणे शहरातील महापालिकेची, खासगी तसेच ससून रुग्णालयात सुमारे दीडशे जणांचा मृत्यू होत असल्याची भयावह घटना आहे. हे प्रमाण कमी व्हावे यासाठी शहरात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कडक निर्बंध लावण्यास सुरवात केली. यामध्ये सायंकाळी सहा वाजताच संचारबंदी लागू केली. त्यानंतर राज्य सरकारने देखील विकेंड लॉकडाऊन त्यानंतर आता शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद आहेत.
लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील गर्दी कमी झालेली असली, तरी किराणा दुकाने, भाजी, फळ विक्री दुकाने येथे शिस्तीचे पालन केले जात नाही. तसेच सोसायट्यांचे परिसर, वस्ती भाग येथे नागरिक मास्क न घालता, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन न करणे, अस्वच्छता करणे असे बेशिस्त वर्तन करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने तरुण वर्गाचा समावेश आहे. अशांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत कारवाई केली जात आहे. मास्क न घातल्यास ५०० रुपये तर, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन न केल्याने १ हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे.
‘‘कामासाठी घराबाहेर पडणारे व्यक्ती नियमांचे पालन करत आहे. पण आपल्याच घराच्या परिसरात सोसायटी, वस्तीमध्ये वावरतना नियमांचे पालन केले जात नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे कारवाईबरोबर आता प्रबोधन करणे ही काळाची गरज ठरणार आहे. नियम मोडणाऱ्यांनाच या कामामध्ये गुंतवले पाहिजे, असा सूर ज्येष्ठ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान महापालिका उपायुक्त माधव जगताप म्हणाले की, ‘‘कोरोनाची साथ आटोक्यात यावी यासाठी महापालिकेचे सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. पण काही नागरिक नियमांचे पालक करत नसल्याने स्वतःसह इतरांना धोका निर्माण करत आहेत. अशांवर कारवाईसाठी मोहीम सुरू आहे. कारवाई होऊ नये, यासाठी तरी नागरिकांनी नियमांचे पालन केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.