नवी दिल्ली वृत्तसंस्था – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तसेच राजकारणातील ऋषी आणि समाजसेवेतील महर्षि असे व्यक्तीमत्व असलेले दिवंगत नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगितकार दिवंगत भुपेन हजारिका यांना देखील भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आज (८ ऑगस्ट) नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांचा भारतरत्न देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून समजल्या जाणाऱ्या भारतरत्न पुरस्कारांची घोषणा जानेवारीमध्ये करण्यात आली होती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देशाच्या राजकारणात मोठे योगदान दिल्याने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव करण्यात येणार आहे. ते राष्ट्रपती होण्याआधी कॉंग्रेसमधील ज्येष्ट नेते व मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ मंत्री होते.
Pranab Mukherjee to be awarded Bharat Ratna today
Read @ANI Story | https://t.co/72LriMB3Yd pic.twitter.com/4JynkXAmg0
— ANI Digital (@ani_digital) August 8, 2019
तर नानाजी देशमुख हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. तर संगितकार भुपेन हजारीका यांनी संगितासाठी आपले आयुष्य घालवले. पहाडी आवाजाचा गायक अशी त्यांची ख्याती होती.
गुरुवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार १९५४ पासून दिला जातो. पहिला भारतरत्न पुरस्कार चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना मिळाला होता. आतापर्यंत ४५ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.