बहुजननामा ऑनलाइन टीम – सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्य सरकारनेसुद्धा राज्यातील नोकर भरती प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे सर्वच स्तरातील इच्छूकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी राज्य सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, प्रशासन चालवणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही एखाद्या समाजासाठी शासनाने थांबणे हे चुकीचे आहे. याचा चुकीचा संदेश जातो. त्यामुळे जे 16 टक्के आरक्षण मराठा समाजाचे आहे ते बाजूला काढा व उर्वरित जागा भरा. प्रकाश आंबेडकर औरंगाबदमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सरकारने थांबून राहू नये
यासंदर्भात आपले मत मांडताना आंबेडकर म्हणाले की, देश आणि राज्य चालवण्यासाठी आमदार, खासदार, ग्रामपंचायत सदस्य पाहिजे असतात, तसेच शासन चालवण्यासाठी नोकरशाही वर्गाची गरज असते. त्यामुळेच मराठा आरक्षणासाठी थांबून राहू नये. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्या निर्णयाच्या अधीन राहून पुढे जायला पाहिजे. 16 टक्के जागा तुम्हाला दिल्या असल्याचे नमूद करून नियुक्तीपत्र देताना या बाबी नमूद करायला हव्यात.
ओबीसी कोट्यातून आरक्षण नको
आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून देण्यास आमचा विरोध आहे. गरीब मराठा आपल्या बरोबरीला येऊ नये असे श्रीमंत मराठा वर्गाला वाटते आहे. त्यामुळेच हा सारा घोळ सुरू आहे. हा घोळ दुरुस्त करता येऊ शकतो. त्यासाठी केवळ इच्छाशक्ती हवी.
ईव्हीएमला विविध राज्यांमधून विरोध
बिहारमधील महाआघाडीतील राजद आणि काँग्रेसने आरोप केला आहे की, ईव्हीएममुळे काही उमेदवार हरले, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आंबेडकर म्हणाले की, ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांवर मतदान घेण्याची आमची मागणी जुनी आहे. आता विविध राज्यांमधूनसुद्धा या मागणीला समर्थन मिळताना दिसत आहे.
राज्य सरकार मंदिरे उघडण्यासंदर्भात आंदोलने होऊनही निर्णय घेतल्याने, प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आंदोलन करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रार्थनास्थळे खुली करत नाहीत. ते फक्त आचार्यांचे ऐकतात, हरिभक्तांचे ऐकत नाहीत अशी अवस्था आहे.