बहुजननामा ऑनलाइन टीम – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठमोठ्या नेत्यांना जनतेने नाकारले पण आता हीच जनता वंचित बहुजन आघाडीसोबत येत्या विधानसभा निवडणुकीत राहणार असून, मराठा समाजदेखील आता प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राहील, असे भाकीत नामदेवराव जाधव यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर केले आहे. तसेच प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे पोषक वातावरण निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांनी जवळपास ४१ लाख मते मिळवली एकूण मतदानापैकी १४ टक्के मतदान मिळवून महाराष्ट्रामधील ३ नंबरचा पक्ष म्हणून वंचित आघाडीने आपले स्थान मिळवले आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा इशारा आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. तसेच काँग्रेसला यापुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल; कारण काँग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे,आगामी विधानसभेत काँग्रेस नेमके वंचितला किती जागा सोडेल याबाबत अजून काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.