मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ‘सध्या कोरोना कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. जे काही जाहीर करायचे असते, ते अजित पवारच जाहीर करतात, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.
राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे शासन स्तरावरील बहुतांश निर्णयांची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशिवाय इतर मंत्री करत असतात. त्यावरून अॅड. आंबेडकर यांनी ठाकरे आणि पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘अजित पवार मला डी फॅक्टो मंत्री वाटतात. अजित पवार म्हणतात की, रेमडेसिव्हिर राज्य सरकार आयात करणार आहे. पण शासनाला तसे अधिकार नाहीत. त्यामुळे ते कोणत्या अधिकाराने बोलत आहेत? असा सवाल उपस्थित आंबेडकर म्हणाले, सध्या कोरोना कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात’.
लॉकडाऊनने कोरोनाची साखळी तुटणार नाही तर…
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊन केल्याने ही साखळी तुटणार नाही. त्याऐवजी जो पहिला रुग्ण आढळतो. तो रुग्ण किती जणांना भेटला आणि त्यानंतर ती व्यक्ती पुढे किती लोकांना भेटली, या सर्वांवर काम करणारी यंत्रणा निर्माण व्हायला हवी. जर तसे केले तरच कोरोनाची साखळी तोडणे शक्य होईल, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
लस 150 रुपयांना द्यावी
सीरम इन्स्टिट्यूटची लस ज्या देशांनी आपल्या येथून घेतली. त्या सर्वांना तीन डॉलर ते पाच डॉलरमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र, पुण्यात उत्पादन होणारी लस आपल्या सर्वांना जवळपास 1200 रुपयांना मिळणार आहे. हे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही सरकारला आठवडाभराची मुदत देत आहोत. ही लस आम्हाला 150 रुपयांत मिळावी. अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला.