मुंबई बहुजननामा : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला ऑफर देऊ केली आहे. विधानसभेसाठीच्या २८८ जागांपैकी १४४ जागा काँग्रेसने लढवाव्यात आणि बाकी १४४ वंचित बहुजन आघाडी लढवेल, अशी ऑफर देण्यात आली आहे. याआधी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस ला ४० जागा लढविण्याची ऑफर दिली होती. दरम्यान वंचित ही भाजप पक्षाची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेस ने केला होता , त्यामुळे जोपर्यंत काँग्रेस या आरोपांचा खुलासा देत नाही, तोवर त्यांच्या आघाडी संदर्भात चर्चा करणार नसल्याचा पवित्रा आंबेडकरांनी घेतला होता. आंबेडकर पत्रकार परिषदेत या संदर्भात बोलले होते.
त्यानंतर आता पुन्हा वंचित आघाडीने काँग्रेसला थेट १४४ जागांची ऑफर दिली आहे. त्यांची ही ऑफर काँग्रेस कधीच मान्य करणार नसल्याने आंबेडकर हे प्रकरण ताणून धरत असल्याने आघाडी शक्य नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही तिरंगी सामना रंगणार असल्याचे दृश्य दिसत आहे. वंचित बहुजन पक्षाकडे विजयी होण्याची शक्यता नसेल , तर आघाडीचे उमेदवार पाडू शकतात.
लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी काँगेसवर भारी पडली होती. अनेक ठिकाणी वंचित आघाडीच्या उमेदवारांना लाखोंनी मत मिळाली होती. त्यामुळे विधानसभेतही हा सामना चांगला रंगणार आहे. प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसशी आघाडी करण्याची थोडीही इच्छा नाही. ते फक्त चर्चेचा देखावा उभा करत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेस ने वंचित आघाडीशिवाय चालण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील वंचितसोबत आघाडी करण्यासाठी उत्सुक नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये निम्म्या – निम्म्या जागांचा फॉर्मुला ठरल्यामुळे काँग्रेसला आपल्या जागा वंचितसाठी सोडाव्या लागतील. प्रकाश आंबेडकरांची हि ऑफर काँग्रेसला मान्य नसल्याने ते देखील चर्चेत आपला वेळ वाया घालवणार नसल्याचे बोलले जात आहे.