बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यात मंदिरं खुली करण्यासदंर्भात राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री(politics) उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं. यावरून आता सरकार(politics) विरूद्ध राज्यपाल असा संघर्ष पेटला आहे असं पुन्हा एकदा दिसत आहे. राज्यपाल हे सरकारच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असून राज्यघटनेला अनुसरून राज्य चालतं की, नाही हे पाहणं राज्यपालांचं कर्तव्य आहे असंही राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणाले, “राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. घटनेनुसार राज्य चालतंय का नाही हे पाहणं त्यांचं काम आहे. ज्यांनी देशात हिंदुत्वाचा वणवा पेटवला, त्या शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळं आम्हाला हिंदुत्त्वाचे धडे घेण्याची गरज नाही. आमचा आत्मा आणि मन हिंदुत्वाचं आहे. आजच पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलं की, महाराष्ट्राला अद्यापही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळं जनतेची काळजी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तमपणे आपली जबाबदारी सांभाळत आहेत. त्याबद्दल राज्यापालांनी त्यांचं कौतुक करायला हवं.” असा सल्ला राऊतांनी राज्यपालांना दिला आहे.
पुढं बोलताना राऊत म्हणाले, “भगत सिंह कोश्यारी यांनी सेक्युलर घटनेला अनुसरूनच राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेलं उत्तर योग्य असून तो ऐतिहासिक ठेवा असेल असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
कोरोना काळात बंद असलेली राज्यातील देवस्थानं आणि मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजप आमने सामने आले आहेत. मला तुमच्याकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारींवर टीका केली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हे कसले सत्तेचे पुजारी ? हे तर सत्तेच लाचारी ! असा टोला शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.