बहुजननामा ऑनलाइन टीम – भद्रावती,दि१३:- (Bhadravati)झाडांना मनुष्याची फुफ्फुसे मानली जातात कारण झाडे मनुष्यांना प्राणवायू पुरवितात.हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन भद्रावती(Bhadravati) शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात प्राणवायुचा पुरवठा व्हावा या उदात्त हेतूने नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या संकल्पनेतून ३० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
येथील पिंडोनी स्मशानभूमिच्या बाजूला १ हेक्टर शासकीय जागेत सदर वृक्षांची लागवड करण्यात आली.विशेष म्हणजे ही वृक्षलागवड जपानमधील मियावाकी पद्धतीने करण्यात आली.आज या वृक्षांची उंची ५ ते ६ फूट झाली आहे.इतर वृक्षांच्या तुलनेत यांची वाढ १० पट आहे.ही वृक्षलागवड करताना दीड फूट जमीन खोदुन ५ बाय ८ चे बेड तयार करण्यात आले.त्यात धानाचा भुसा मिळवून कंपोस्ट खत टाकण्यात आले.एका चौरस मीटरमध्ये ३ वृक्षे याप्रमाणे चक्क ३० हजार वृक्षे लावण्यात आली.ही वृक्षे सरळ आणि उंच वाढणार असून या वृक्षांचे जंगल घनदाट राहणार आहे.त्यामुळे प्राणवायुचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होऊन शहरातील प्रदुषण रोखण्यास मदत होणार आहे. या जागेत पांढरा खैर,काळा खैर,आंबा,चारोळी,तेंदूपत्ता,रो हम,आस्टा इत्यादी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.