पुणे : बहुजननामा ऑनलाईन – माओवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप असलेले विचारवंत डॉ.आनंद तेलतुंबडे यांची पुणे पोलिसांनी गुरुवारी 6 तास कसून चौकशी केली. त्यांची पुन्हा 19 फेब्रुवारी रोजी चौकशी होणार आहे. आनंद तेलतुंबडे यांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे उघड झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 11 फेब्रुवारीपर्यंत सक्षम न्यायालयात जामिनासाठी अर्ज करायला सांगून तोपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज 1 फेब्रुवारी रोजी फेटाळला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 फेब्रुवारीला ते केरळ येथून मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यांना पुण्यातील न्यायालयात हजर केल्यावर तेलतुंबडे यांनी आपल्याला 11 फेब्रुवारीपर्यंत सरंक्षण दिले आहे. आपण पोलिसांना तपासात सहकार्य करायला तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरवून त्यांना सोडून देण्याचा आदेश दिला होता. याविरोधात पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने पुणे पोलिसांचे म्हणणे ऐकून घेऊन तेलतुंबडे यांना 14 आणि फेब्रुवारी रोजी पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश देऊन त्यावर 22 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आनंद तेलतुंबडे हे एल्गार परिषद गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी 10 वाजता हजर झाले. पोलिसांनी त्यांची बंद खोलीत चौकशी सुरू केली. या चौकशीत माओवादी चळवळीशी आपला कसा संबंध आला. चळवळीचा प्रभाव वाढविण्यासाठी आपण काय केले आणि का केले, माओवादी संघटनांवर बंदी असताना त्यांच्याशी संपर्क कशासाठी ठेवला अशाप्रकारे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. दुपारी 2 पर्यंतही चौकशी झाली. त्यानंतर जेवणासाठी काही वेळ चौकशी थांबविण्यात आली. त्यानंतर 3 वाजता त्यांची पुन्हा चौकशी सुरू झाली. याबाबत आनंद तेलतुंबडे यांनी सांगितले, “आपण पोलिसांना तपासासाठी सहकार्य करीत असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत अधिक काही सांगता येणार नाही.’