नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात बेरोजगारी वाढताना दिसत आहे. आर्थिक मंदीचे सावट आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा तोलही ढासळताना दिसत आहे. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोदी सरकार लवकरच काही मोठे आणि धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता आहे.
करांमध्ये सवलत, नोकऱ्या टिकवण्यासाठी आवश्यक ते धोरणात्मक निर्णय अशा घोषणांची सुरुवात आजपासूनच होण्याची शक्यता आहे. जे उद्योग आर्थिक संकटांशी झुंजत आहे अशा उद्योगांना पॅकेज देण्याबाबत आधीच संकेत मिळाले आहेत. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मोठे निर्णय घेण्याचे कारण म्हणजे भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये.
उद्योग जगतातील वाढती चिंता दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: हस्तक्षेप करणार आहेत. इतकेच नाही तर, देशी विदेशी गुंतवणूकदारांमध्ये विश्वास जागवण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी मोदी स्वत: त्यांच्याशी संवाद साधू शकतात. सरकारी खर्च कपात करण्यासासारखा मोठा निर्णयेदेखील घेतला जाऊ शकतो.
काय असतील मोदी सरकारचे संभाव्य निर्णय ?
करसुधारणा- उद्योगांसह सर्वसामान्यांनाही करामध्ये दिलासा देण्याचा विचार
नोकऱ्यांसाठी- उद्योग क्षेत्रातील नोकऱ्या टिकून रहाव्यात हा हेतू. यासाठी उद्योगांना वेगळ्या पद्धतीचे पॅकेज देण्याची तयारी
गुंतवणूकदारांशी संवाद- देशी विदेशी गुंतवणूकदारांमध्ये विश्वास जागवण्यासाठीही नरेंद्र मोदी स्वत: संवाद साधू शकतात.
खर्चात कपात- अनेक प्रकारच्या अनावश्यक सरकारी खर्चांना फाटा देऊन दोन वर्षांत सुमारे 75 हजार कोटी रुपये वाचवण्याचे लक्ष्य