मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर भाजपशी फारकत घेत आपली २५ वर्षांची युती तोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा करून सरकार स्थापन केले. तेव्हापासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमधील तू-तू मै-मै सुरूच आहे. त्यातच आज त्यांनी जनतेने निवडून दिलेले नाही, मात्र तरीही आता खुर्ची मिळाली आहे तर नीट काम करावं, असा चिमटा काढला आहे.
एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी अमृता फडणवीस बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “राज्य सरकारने शहाणे व्हावे, जनतेने त्यांना निवडून दिलेलं नाही, मात्र तरीही आता खुर्ची मिळाली आहे तर नीट काम करावे. कुणी काही बोलतेय त्यावर प्रतिक्रिया देऊन त्रास देणे बंद करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. तद्वतच, जलयुक्त शिवारसारख्या योजनतेही देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मोठा माणूस मोठाच राहतो,” असेही त्यांनी सुनावले.
तथापि, या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र मैदानात उतणार असल्याचे सांगितले, तर जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत उमेदवार निश्चित केले जातील, असे म्हटले.