नवी दिल्ली : वृत्तसंस्था – योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने करोना सात दिवसांत पूर्णपणे बरा करणारे पहिले आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. मात्र, आयुष मंत्रालयाने तातडीने जारी केलेल्या आदेशाद्वारे पतंजलीला या औषधाची जाहिरात करण्यास मनाई करण्यात आली. ‘आयुष’ने पतंजलीकडे या औषधातील घटकांचा तपशील मागितला असून, जोवर त्याची पडताळणी होत नाही, तोवर ही बंदी कायम राहणार आहे.
पतंजलीकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कम्युनिकेशन गॅप होती ती आता दूर करण्यात आल्याची प्रतिक्रिया पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली. हे सरकार आयुर्वेदाला चालना देणारे आहे. जी आमच्यात कम्युनिकेशन गॅप होती ती आता दूर झाली आहे. रँडमाइझ्ड प्लेसबो कंट्रोल्ड क्लिनिकल ट्रायल्सचे जे काही मापदंड आहेत ते 100 टक्के पूर्ण करण्यात आले आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे, अशी माहिती पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात एक ट्विटही केले आहे.
रामदेवबाबा यांनी हरिद्वारमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘कोरोनील’ आणि ‘श्वसरी’ औषधांची करोनाबाधित रुग्णांवर चाचणी करण्यात आल्याचा आणि ही औषधे 100 टक्के परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा केला. या औषधांमुळे केवळ सात दिवसांत कोरोना पूर्णपणे बरा होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या औषधाची परिणामकारकता तपासण्यासाठी पतंजलीने किती नमुन्यांची तपासणी केली, हे वैद्यकीय प्रयोग कोणत्या ठिकाणी झाले, कोणत्या रुग्णालयांत हे संशोधन झाले, त्यासाठी संस्थात्मक तत्त्व समितीने परवानगी दिली होती काय, याचा तपशील पतंजलीकडे मागण्यात आला आहे, असे आयुषतर्फे सांगण्यात आले होते.