अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला १२ जागाच हव्या आहेत, आणि काँग्रेसने ते द्याव्यात, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात आम्ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऊभे करू असा इशारा भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाआघाडीत सामील होण्याचे चिन्ह कमी दिसत आल्याचे मत राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीत घेण्यासाठी बैठकी सुरु आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली, मात्र त्यावेळी आघाडीबाबत कुठलाही निकष निघाला नाही. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी आघाडी समोर १२ जागांची मागणी केली होती. मात्र काँग्रेसने देण्यास नकार दिला होता. इतकेच नव्हे तर, काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांना ६ जागा देण्यास तयार असल्याचे वृत्त आले होते. मात्र प्रकाश आंबेडकर १२ जागांवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, आम्हाला ४ किंवा ६ जागा हव्यात ही चर्चा प्रसार माध्यमात आहे. मात्र आम्ही लोकसभेच्या १२ जागांबाबत कुठलीही तडजोड करणार नाहीत. आम्ही १२ जागांवर ठाम आहोत. असे प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथील सभेत म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर, जर आघाडीत आम्हाला १२ जागा दिल्या नाहीत तर आम्ही महाराष्ट्रातील सर्व म्हणजेच ४८ लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऊभे करू असा इशाराही त्यांनी दिला.