मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी नुकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले आणी गृहनिर्माणमंत्रीपदाची शपथ घेतलेले राधाकृष्ण विखे-पाटील विधान भवनात येताच आयाराम, गयाराम, जय श्रीराम अशा घोषणा दिल्या.
नुकताच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला यामध्ये सरकारने अनेक मंत्र्यांना डच्चू देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. नवे मंत्री विधान भवनात येऊ लागल्यावर विरोधकांनी पायऱ्यांवर बसून, हाती फलक घेत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. राधाकृष्ण विखे पाटील विधान भवनात येताच आयाराम, गयाराम, जय श्रीराम अशा घोषणांनी भवन परिसर दणाणून सोडला. ‘विकासाची सगळी स्वप्ने भंग, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारात दंग’, आले रे आले चोरटे आले, अशा प्रकारच्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात येताच देण्यात आल्या.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि मुख्यमंत्री असा सामना पाहायला मिळाला. दरम्यान, विधानसभा सभागृहात कामकाजाला सुरुवात होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली. यावेळी विरोधकांनी राधाकृष्ण विखे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबद्दल आक्षेप नोंदवत राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना मंत्रिपद कसे काय दिले जाऊ शकते ? एखाद्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यावर मंत्रीपद देणे योग्य आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली.