बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून मुंबईत एकूण कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 1 लाख 178 इतकी झाली आहे. काल दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या 5 हजार 647 वर पोहोचली आहे. मुंबईतील मृत्युदर 5.6 टक्क्यांवर कायम आहे, तर 70 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईतील विविध भागात सध्या 24 हजार 39 उपचार घेत असून काल 1 हजार 152 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आतापर्यंत 70 हजार 492 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील दोन दिवसांत 10 ते 20 वयोगटातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त मृत्यू अंधेरी, जोगेश्वरी पूर्व भागातील 416 इतके आहेत. त्याखालोखाल धारावी, माहीम परिसरातील 413 मृत्यू आहेत, तर कुल्र्यातील 387 मृत्यू आहेत.
मुंबईतील रुग्णवाढीचा दर 1.30 टक्क्यापर्यंत खाली आलेला असला तरी बोरिवली आणि मुलुंडमध्ये मात्र रुग्ण वाढत आहेत. बोरिवलीत गुरुवारी एका दिवसात 135 रुग्ण आढळले, तर शुक्रवारी 84 रुग्णांची नोंद झाली. तर सर्वात कमी रुग्ण मशीद बंदर, उमरखाडी भागात आढळले आहेत.