औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारने दिलंय. त्यामुळे यापुढे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चे निघणार नाहीत. मात्र, ओबीसींच्या अन्य अनेक प्रलंबित मागण्यांसाठी लढा सुरूच राहील, असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ यांनी येथे दिलाय.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शुक्रवारी (दि.18) सकाळी 10 वाजता औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार होता.
मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने महात्मा फुले चौकात झालेल्या आभार सभेत भुजबळ बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, बाळासाहेब कर्डक, सुभाष राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, मराठा समाजाच्या काही जणांनी वेगळी याचिका दाखल केलीय. त्यात ओबीसी आरक्षण चुकीचे आहे, असे म्हणणे मांडले आहे. त्यामुळे आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरावे लागत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असा शब्द दिलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही असेच आश्वासन दिलंय. विरोधी पक्षही ओबीसींच्या बाजूने असल्याने भीती नाहीशी झालीय. त्यामुळे औरंगाबादेतील मोर्चा शेवटचा असणार आहे. यापुढील मोर्चे रद्द केले जात आहेत. यापुढे पदाधिकारी संबंधित ठिकाणी तहसीलदारांना केवळ निवेदन देऊन मागण्या मांडल्या जातील.
यावेळी बापूसाहेब भुजबळ, बाळासाहेब कर्डक, मनोज घोडके आदींनी मनोगत व्यक्त केले. मराठा आरक्षणासाठी समाजाचे मोर्चे निघत असताना ओबीसी समाजाने पाठिंबा दिला. आज ओबीसी आरक्षण बचाव मोर्चे निघत असताना कोणी पाठिंब्यासाठी समोर आले नाही, अशी खंत घोडके यांनी व्यक्त केलीय. निवडणुकाजवळ आल्यानंतर त्यांना आपली आठवण येते. त्यावेळी त्यांना जागा दाखवू, असा इशारा घोडके यांनी दिलाय.