पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ‘कल्चर ते अॅग्रीकल्चर’ सगळीकडे मोदी सरकारने विध्वंस करुन ठेवला आहे. समाजाला लुळेपांगळे करुन राज्य करायचे कारस्थान संघ परिवाराने रचले आहे. अशा परिस्थितीत देशाची अत्यंत कष्टातून, त्यागातून निर्मिलेली लोकशाही प्राणपणाने जपली पाहिजे, असे प्रतिपादन पत्रकार निरंजन टकले यांनी केले. मोदी जर ‘हिटलर’ बनण्याच्या टाईमलाईनवर असतील, तरी भारताने जर्मनी बनण्याच्या टाईमलाईनवर राहू नये. आपल्या पुढच्या पिढयांना भयमुक्त वातावरणात जगता यावे, यासाठी आपल्यालाच लढा द्यावा लागणार आहे. राजकीय पक्षांचे महागठबंधन होवो, न होवो, मतदारांचे महागठबंधन झाले पाहिजे. भाजप विरोधांतील सशक्त उमेदवारालाच मतदान जाईल, असे काम आपण केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
मोदी सरकार हे राष्ट्रीय संकट आहे, ते परतवून लावले पाहिजे ‘जनतेला सतत भावनेच्या आहारी ठेवले आहे. धर्मद्वेष, धर्म प्रेम, खोटे राष्ट्र प्रेम अशा अनेक घटकांना एकत्रित लस सत्ताधाऱ्यांनी तयार केली आहे. सत्य पुढे येऊ द्यायचे नाही, हा या सरकारचा निर्धार आहे. खोटी आकडेवारी देण्यात हे सरकार पटाईत आहे. सांख्यिकी विभागाचे आकडेही बदलण्यात येत आहेत. अत्यंत खालच्या थराला जाणारा हा पंतप्रधान मिळणं ही लाजीरवाणी गोष्ट ठरली आहे. दलीत, मुस्लीम मतदारांची नावे वगळण्याचे पध्दतशीर कारस्थान सुरू आहे. म्हणून जागरूक राहण्याची गरज आहे. ‘सयद शूजा प्रकरणी त्याने सांगितलेल्या माहितीवरून अधिक शोध घेणे हे माध्यमांचे काम असताना त्यालाच प्रश्न विचारले जात आहेत. वामन मेश्राम, एकनाथ खडसे यांनीही २०१४ च्या निवडणूक प्रक्रियेबद्दल मतमतांतरे व्यक्त केली, मग त्यांना कोणी अधिक माहिती विचारत नाही ? शूजा हा कारस्थानाचा बळी आहे, त्याला प्रश्न विचारायचे का ज्यांच्यावर आरोप झालेत, त्यांना प्रश्न विचारायचे ? अनेकांनी शंका व्यक्त करुनही निवडणूक आयोगही झटकन ईव्हीएम बाबत आपला निर्धार लगेच जाहीर कसा करते ? असे सवालही टकले यांनी उपस्थित केले.
‘प्रा.सुभाष वारे म्हणाले, ‘मतदान केल्यावरही नागरिकांनी लोकशाही टिकविण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. ही राजवट संविधान विरोधी आहे. जनता रोज प्रतिक्रिया देत नाही, ती मतदानाद्वारे व्यक्त होते. त्यांना व्यक्त होण्याच्या भूमिकेपर्यंत आपण घेऊन गेले पाहिजे.
डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, भारताच्या खेड्यातील माणूस धर्मनिरपेक्ष आहे. तसेच, राहुल पंतप्रधान होणार असतील तर त्यांना फुले -शाहू – आंबेडकर यांच्याशी ओळख करून देण्याची गरज आहे. ‘गुजरात फाईल्स्’ आणि ‘आय एम ए ट्रोल’ या दोन पुस्तकांचा आपण हत्यारासारखा वापर केला पाहिजे. काँग्रेसला विरोध करता करता आपण भाजपला पायघड्या घालता कामा नये. हा संपूर्ण परिवारच परत सत्तेवर येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
श्रीरंजन आवटे म्हणाले, ‘सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. संविधान की मनुस्मृती, लोकशाही की हुकूमशाही असा हा संघर्ष आहे. तटस्थ असणे सोडून आता ठाम भूमिका घेण्याची गरज आहे.
यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी (युवा क्रांती दल) निरंजन टकले (पत्रकार),डॉ. अभिजित वैद्य (राष्ट्रीय प्रमुख ,आरोग्यसेना ),श्रीरंजन आवटे (युवा लेखक),प्रशांत कोठडीया (मतदार जागृती परिषद) ,जांबुवंत मनोहर (संघटक,युवा क्रांती दल ),संदीप बर्वे (संघटक,युवा क्रांती दल), जांबुवंत मनोहर (संघटक ,युवा क्रांती दल ),मयुरी शिंदे (युवा क्रांती दल ,पुणे शहराध्यक्ष त्रिवेणी मार्डीकर ,सचिन पांडुळे ,अजय मेमाणे ,रोहिणी पवार ,दुर्गा शुक्रे ,इस्माईल शेख,सर्फराज अहमद (मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक )आदी लोक उपस्थित होते.