बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात मंगळवारपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी घेतला. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर सडकून टीका केली. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
वार्ताहरांना बोलताना राऊत म्हणाले, “भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत सुटतात. टीका करणाऱ्या भाजपच्या लोकांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा, असा चिमटा काढत टीका करणाऱ्यांना लोक मारायची आहेत. तर मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. संचारबंदी लागू करण्यात मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही,” असेही त्यांनी नमूद केलं.
उद्धव ठाकरे आजही बाळासाहेबांचे शिवसैनिक
“महाराष्ट्राचे नेतृत्व तीन पक्षाच्या नेत्यांनी करायचं ठरलं आहे. आमचा एकही आमदार फुटणार नाही, असे विरोधक म्हणतात. मात्र, काही दिवस थांबा, काय काय होतेय ते दिसेल. भविष्यात तो भूकंप होईल त्याचे केंद्रस्थान शिवसेना भवन असेल. उद्धव ठाकरे यांनी देशाचे नेतृत्व करावे अशी अनेकांची इच्छा आहे. शिवसेना फक्त पक्ष नाही, सेना एक कुटूंब आहे आणि बाळासाहेब आमचे कुटूंब प्रमुख आहेत. आजही उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून काम करत आहेत,” असे सुद्धा राऊत यांनी सांगितलं.
मोदींचे दौरे आणि राऊतांची टीका
गेल्या कित्येक महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात गेले नाही. त्यामुळे परदेशात कोरोनाची काय परिस्थिती आहे हे भाजपवाल्यांना कळणार नाही. जरा परदेशात काय चाललं ते पाहा. ब्रिटनमधून होणारी विमानसेवा ४२ देशांनी बंद केली. कशासाठी केली आहे? काही कळत का भाजपला, अशी विचारणाही राऊतांनी केली.