पुणे : बहुजननामा ऑनलाईन – “चळवळीला पुढे नेण्यासह आपल्या परखड साहित्यातून चुकीच्या गोष्टींवर प्रहार करण्याची त्यांची शैली होती. त्यांचे लिखाण मार्मिक होते. पुस्तके हाच त्यांचा ध्यास होता आणि नव्या पिढीला साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रंथालय उभारण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी माझ्या खासदार निधीतून रमाबाई आंबेडकर नगरात ग्रंथालय उभारण्यासाठी ४० लाखांचा निधीही मंजूर केला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे तो मिळण्यास विलंब झाला आणि राजा ढाले ग्रंथालय उभारण्याआधीच निघून गेले. त्यांच्या हयातीत ग्रंथालय उभारले असते, तर त्यांना फार आनंद झाला असता. आता त्यांचे ग्रंथालय उभारण्याचे अपुरे स्वप्न पूर्ण करून व त्यांचे चांगले स्मारक उभारून त्यांचा सन्मान करणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित ‘राजा ढाले आणि आंबेडकर चळवळ’ परिसंवादावेळी कालकथित राजा ढाले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रामदास आठवले बोलत होते. मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमावेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, ढाले यांच्या पत्नी दिक्षा, मुलगी गाथा, सीमा रामदास आठवले, लेखक अर्जुन डांगळे, शरणकुमार लिंबाळे, इंदिरा आठवले, डॉ. विजय खरे, चंद्रकांता सोनकांबळे, समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले,”कालकथित राजा ढाले लढवय्या नेते होते. सिद्धार्थ वसतिगृहात असल्यापासून माझा-त्यांचा स्नेह होता. दलित पँथर चळवळीत त्यांचे काम आम्हाला प्रभावित करीत होते. त्यांच्यात आणि माझ्यात संवाद कमी होता. मात्र, आमच्यामध्ये वाद नव्हते. आंबेडकरी चळवळीमुळेच मला मंत्रिपदापर्यंत पोहचता आले. डॉ. आंबेडकरांप्रमाणेच ढाले नेहमी वाचनाला महत्व देत. कोणतीही बाजू अत्यंत खंबीरपणे आणि परखडपणे मांडत. राजा ढालेंनी चळवळीला एक व्यापक स्वरूप दिले होते. प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर होता.”
अविनाश महातेकर म्हणाले, “राजा ढाले यांचे विचार ऐकायला तरुण वर्ग नेहमी आतुर असायचा. रिपब्लिकन पक्ष मध्यंतरी खिळखिळा झाला होता. तरुण पडीही आंबेडकरांना मानायची. मात्र, रिपब्लिकन पक्षाला मानत नव्हती. तेव्हा ढाले यांनी पँथर पक्षाची स्थापना करून आंबेडकरी विचारांच्या लोकांना एकत्रित आणले आणि आंबेडकरी चळवळीतून बाहेर पडणारा वर्ग थांबवला. त्यांनी अनेक पर्यायी शब्द उपलब्ध करून दिले. त्यामधील कालकथित हा शब्द जास्त गाजला. त्यांची शब्दांवर पकड होती. त्यांचा तर्कशास्त्रावर गाढा अभ्यास होता.” यावेळी राज्याचे पाहिले मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासोबत ढाले यांच्या भेटीच्याही काही आठवणी महातेकरांनी सांगितल्या.
इंदिरा आठवले म्हणाल्या, “राजा ढाले हे लढवय्या होते. त्यांच्या समतेच्या लढाईची आजही गरज आहे. दलित साहित्य नावारूपाला येण्याचे श्रेय ढाले यांना जाते. त्यांनी बाबासाहेबांच्या लढ्याला रस्त्यावर उतरून पाठींबा दिला. सांस्कृतिक चळवळीसाठी पँथरची लढाई उपयुक्त होती. शेवटच्या माणसापर्यंत समतेची लढाई लढली गेली पहिजे, असे ते म्हणायचे. साहित्याला अनेक नवनवीन शब्द दिले. तर्कशुद्ध आणि विज्ञानवादी दृष्टीकोनातून त्यांचे साहित्य आधारलेले होते.”
शरणकुमार लिंबाळे म्हणाले, “राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरची चळवळ उभी केली. दोघांनीही आंबेडकर यांच्यानंतर तरुणांना प्रभावित केले. या दोघांनी आंबेडकर चळवळ जिवंत ठेऊन त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला. त्यांची अनेक आंदोलने आणि भाषणे नेहमी प्रसिध्दीच्या झोतात राहायची. अनेकदा यामुळे वाद देखील निर्माण व्हायचे. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यामुळे चळवळ जोर पकडू शकली नाही, हे दोघे जर एकत्र राहिले असते तर आज आंबेडकर चळवळ खूप पुढे गेली असती.”
परशुराम वाडेकर प्रस्ताविकात म्हणाले, “लहानपणीच पँथर चळवळीत जोडला गेलो. राजा ढाले यांचा सहवास ऊर्जा देणारा होता. ढाले अतिशय आक्रमक आणि ठाम भूमिका घेणारे होते. पँथरच्या आंदोलनामुळे अनेकांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या, मात्र, या चळवळीकडे लक्ष दिले नाही. आजचे कार्यकर्ते फक्त सोशल मीडियावर चळवळ उभी करत आहेत.” अर्जुन डांगळे यांनी राजा ढाले यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. विजय खरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दीपक मस्के यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.