मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले असून उद्धव ठाकरे यांनी काळ मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे-पाटलांची निवड करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली होती. परंतु सरकार स्थापन झाल्याने राज्यपालांनी दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली. दरम्यान, सरकार स्थापन झाल्याने उद्या महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणीही घेण्यात येणार आहे.
दरम्यान, विधिमंडळ सचिवालयाच्या कार्यालयाने विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी सहा ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाला पाठवली होती. यामध्ये भाजपाच्या तीन, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तीन आमदारांच्या नावांचा समावेश होता. यातून भाजपाच्या कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती झाली होती. मात्र त्यात फेरबदल करण्यात आला असून त्यांच्याऐवजी दिलीप वळसे-पाटलांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील सलग सातव्यांदा विजयी झाले आहेत. २००९ ते २०१४ या कालखंडात दिलीप वळसे-पाटील विधानसभेचे अध्यक्ष होते. १९९० ला जनता दलाचे खासदार असलेले किसनराव बाणखेले यांचा तालुक्यावर प्रभाव होता. मात्र त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून वळसे-पाटील यांनी बाणखेले यांचे गुरू अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना पराभूत केले. तसेच आघाडी सरकारच्या काळात त्यांनी वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा विभागासारखी महत्त्वाचे मंत्रिपदं सांभाळली होती.