मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजप नेते नारायण राणे (narayan-rane) यांनी दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजणार, भाजप राज्यात दिवाळीनंतर ऑपरेशन लोटस ( operation-lotus) राबविणार, असा दावा करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाराण राणे हे दुःखी आत्मा आहेत. त्यांची विक्रम-वेताळसारखी अवस्था झाली आहे. टीव्हीवर जसे एका जाहिरातीत ‘ढूंडते रह जाओगे’ असे म्हटलेय तसेच पुरावे त्यांच्याजवळ आहेत, असा घणाघात गोऱ्हे यांनी केला. राणे यांनी सेनेवर गंभीर आरोप केले असून, त्यांनी 12 डिसेंबरपर्यंत त्याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी, असेदेखील गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे-वायकर कुटुंबीयांच्या नावावर 21 सातबारा उतारे आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या आरोपांवर गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोमय्या यांचे व्यक्तिमत्त्व पाहिले तर त्यांचे विषय जेवणातल्या लोणच्याप्रमाणे आहेत. किरीट सोमय्या पांचट आहे हा वायकरांचा शब्दप्रयोग मला फार आवडल्याचा टोला गोऱ्हे यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’चे केलेले आवाहन त्यांच्या वैयक्तिक कुटुंबाला उद्देशून म्हणाले नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्र किंवा भारतातील जनता माझे कुटुंब आहे, याची काळजी घेऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रकारे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. जनतेची दिशाभूल होत आहे. आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. हे सर्व राजकीय वैफल्याचं दर्शन असल्याची टीका गोऱ्हे यांनी केली.
महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्कीच : राणे
बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा नारायण राणे यांनी केला. मात्र, तूर्तास याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. लवकरच मी याबद्दल प्रसारमाध्यमांशी सविस्तर बोलेन, असे राणे यांनी सांगितले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात राणे यांच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.