औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेत झालेल्या चुका टाळून येणाऱ्या विधानसभेत महाआघाडी बरोबरच मनसे, वंचित बहुजन आघाडी इतर पक्षांनी एकत्रित येऊन विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. यासंदर्भात लवकरच आपण वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेच्या १५ ते २० जागा लढविण्यास उत्सुक आहे. परंतु मी स्वत: विधानसभेची निवडणूक लढवावी की नाही याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. EVM मध्ये मतांची नक्कीच फेरफार झालेली आहे. एका ठिकाणी दिलेले मत दुसऱ्या ठिकाणी जातंय हे वारंवार सिद्ध होत चाललेय; पण याच्याकडे ना निवडणूक आयोग लक्ष देत आहे ना सर्वोच्च न्यायालय. दोघांनीही आमच्यासह २२ पक्षांचे म्हणणे फेटाळले आहे त्यामुळे ही बाब चिंताजनक आहे.
पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि, मी भाजपची साथ सोडली याचा मला जराही पश्चात्ताप नाही. कारण हे सरकार शेतकरीविरोधी आहे, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुपटीने वाढल्या. कधी नव्हे एवढा कृषी खात्याचा जीडीपी ३ टक्क्यांपेक्षा खाली गेला, माझा पिंड विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी मी संघर्ष करीतच राहणार, तसेच भाजपसोबत मैत्री करून पाहिले पण हे सरकार शेतकरी विरोधी असल्याने लगेच त्यांच्याशी फारकत घेतली. असेही ते यावेळी म्हणाले.