पाटणा : वृत्तसंस्था – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Election) राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) काठावरच बहुमत मिळाले आहे. त्यानंतर सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आज पाटण्यात एनडीएच्या आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) यांची गटनेते म्हणून औपचारिक निवड होणार आहे.
बैठकीला भाजपचे दिग्गज नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहेत. याशिवाय बिहार विधानसभा निवडणुकीचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस देखील सहभागी होणार आहेत. नितीश कुमार यांची एनडीएचे गटनेते म्हणून निवड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री निवासस्थानी शुक्रवारी झालेल्या बैठकीत झाला. बैठकीला एनडीएचे चारही घटक पक्षांचे (जेडीयू, भाजप, हम, व्हीआयपी) नेते उपस्थित होते. एनडीएची पुढील बैठक रविवारी होणार असून त्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी दिली. त्यामुळे आज होणारी बैठक अतिशय महत्त्वाची आहे.
भाजपा NDA मधील सर्वात मोठा पक्ष
भाजपने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 74 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने पहिल्यांदाच जेडीयूपेक्षा जास्त जिंकल्या आहेत. त्यामुळे आता भाजप युतीमधील मोठा भाऊ ठरला आहे. जेडीयूला विधानसभा निवडणुकीत 43 जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही सरकारच नेतृत्त्व नितीश कुमारच करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेतृत्त्वाने स्पष्ट केले आहे.
नेतृत्व करण नितीशकुमारसाठी आव्हानात्मक
नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपपेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपच्या आमदारांची संख्या वाढल्याने नितीश कुमार यांच्याकडे सरकारचे नेतृत्त्व आहे. तरीही सरकारवर भाजपचे वर्चस्व राहणार आहे. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचे नेतृत्त्व करण नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.