मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. यावर सत्तेतील तिन्ही पक्षांचे एकमत आहे. शिवसेना कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, या म्हणण्यात काहीही तथ्य नाही, असे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच सध्या जो तपास सुरू आहे, त्याचा निष्कर्ष आल्यावर बोलणे उचित ठरेल, असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर अधिक बोलणे टाळले.
मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांचे नाव मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आले आहे. त्यावरून त्यांच्यावर कारवाईसह गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, एनआयए आणि एटीएसमार्फत या प्रकरणाचा तपास केला जात आहे. यामध्ये राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. या प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची भूमिका आहे.
पूर्वनियोजित बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची महत्त्वाची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. सचिन वाझे अटकेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, ही बैठक पूर्वनियोजित होती, असे त्यांनी सांगितले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दर तीन-चार महिन्यांनी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतात. त्या अनुषंगानेच आजची बैठक झाली, असे स्पष्ट केले.
देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही
सचिन वाझे यांचे नाव या प्रकरणात आल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर ते म्हणाले, गृहमंत्र्यांनी त्या-त्या वेळी योग्य भूमिका मांडलेली आहे. त्यांचे यात काहीही चुकलेले नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही पाटील म्हणाले.