मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना एनआयएने अटक केली आहे. एनआयएने केलेल्या चौकशीमध्ये वाझेंनी काही बडे पोलीस अधिकारी आणि नेत्यांची नावे घेतल्याचे समजते. या प्रकरणात ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्याने मुंबईचे पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री बदलले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याबाबत कोणतेही अंदाज बांधण्याची गरज नाही. गृहमंत्र्यांच्या राजीनामा घेण्याची गरज नाही. राज्याच्या गृहमंत्रीपदी अनिल देशमुख हेच राहणार आहेत. माध्यमांमध्ये कुणाच्याही नावांची चर्चा होत असली तर खातेपबदल होणार नाही.
सचिन वाझे प्रकरणामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुठलीही चूक केली नाही. गृहमंत्री योग्यप्रकारे काम करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीला एटीएस तपास करत होती. नंतर त्यात एनआयएने तपास सुरू केला. त्यांना अधिक माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई झाली. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालण्याचा सरकारचा हेतू नाही. तपासामधून जे सत्य समोर येईल, ते न लपवता आम्ही कारवाई करणार असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर विरोधकांनी अधिवेशनात ठाकरे सरकारला कोंडीत पकडल होत. तेंव्हा गृहमंत्री देशमुखानी वाझेंची पाठराखण केली होती. तर सचिन वाझे हे लादेन आहेत का? असा सवाल मुख्यमंत्री ठाकरेंनी केला होता. त्यानंतर वाझे यांच्याविरोधात पुरावे सापडल्याने NIA ने त्यांना अटक केली आहे. यामुळे ठाकरे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरु आहे. पवारांनी मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर गृहमंत्री देशमुख यांच्या मंत्रिपदावर गंच्छती येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.