बहुजननामा ऑनलाईन – ‘पक्षांतराबाबत आमच्या मनात अजिबात राग, द्वेष नाही. सोडून गेलेल्या प्रत्येक नेत्यानं एकेकाळी माझ्या वडिलांना साथ दिली आहे. मला याची जाणीव आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल आदर कायम राहील,’ असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीला गळती लागली आहे. राष्ट्रवादीतील अनेक आमदार, ज्येष्ठ नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यातच अलीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळही राष्ट्रवादीला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात सुळे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे भुजबळांचा पक्षांतराचा निर्णय पक्का झाल्याचा अंदाच बांधण्यात येत आहे. भुजबळ राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरु असताना मात्र दोन्ही पक्षांकडून ही बाब फेटाळण्यात आली होती. याबाबत सुळेंना विचारले असता त्यांनी नाव न घेता पक्ष सोडून जाणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्या म्हणाल्या, ‘सध्या पक्षात परिक्षेचा काळ सुरू आहे. या कठीण परिस्थितीत माणसं सोडून गेली की वाईट वाटणारच. कारण आम्ही फक्त पक्ष म्हणून नव्हे तर कुटुंब म्हणून काम करतो. आपल्याकडं लोकशाही आहे. प्रत्येकजण स्वत:चा निर्णय घेऊ शकतो. आम्ही कोणावरही दबाव टाकणार नाही. हे आमच्या तत्वात बसत नाही,’ सुळे यांच्या या भावनिक वक्तव्यामुळे भुजबळांबद्दल पुन्हा संशयाचं धुक अधिकच दाट झाल आहे. दरम्यान, भुजबळ यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी त्यांना फोन केला होता. मात्र, तो फोन भुजबळांनी घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे.