पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शरद पवार यांच्यावर कोणत्या ना कोणत्या कारणावरून टीका करत असतात. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर देखील ते सातत्याने टीका करताना दिसतात. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मिश्किल शैलीत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
चंद्रकांत पाटील यांच्यावर सातत्याने राज्य सरकारवर टीका करत असतात. मंत्री धनंजय मुंडे यांच्या वरील आरोप असोत किंवा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील शिवसेना मंत्र्यावर झालेले आरोप, या सगळ्यावरुन चंद्रकांत पाटील ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं. ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे रहायला जावं लागतं, त्यांच्या विषयी मी काय बोलणार, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
माजी सरन्यायाधीशांचे ‘ते’ विधान चिंता वाटायला लावणारे
पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी चीन, पाकिस्तान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलण्यास टाळलं. परंतु, माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी खेद व्यक्त केला. शरद पवार म्हणाले, माजी सर न्यायाधीशांच विधान धक्कादायक आहे. त्यांनी न्याय व्यवस्थेबाबत त्यांच्या परीने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला की काय हे मला ठाऊक नाही. मात्र, त्यांचे हे विधान प्रत्येकाला चिंता करायला लावणारं आहे. न्यायव्यवस्था किती उच्च आहे, हे न्यायाधिशांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. पण, त्यानंतरचं हे विधान निश्चितच चिंताजनक आहे.
काय म्हणाले होते रंजन गोगोई ?
देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचारलं तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही, असे माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी म्हटले होते. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना चिंता व्यक्त केली आहे.