बहुजननामा ऑनलाइन टीम – महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबद्दल भाजपने आक्षेप नोंदवला होता. त्यावर ‘हेलपाटे न घालता कर्जमाफी आम्ही देऊ. भाजपाने जनतेला हेलपाटे मारायला लावले’, असे म्हणत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटलांनी भाजपावर पलटवार केला आहे. पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाजपाला त्यांनी टोला लगावला आहे.
ऑनलाईन कर्जमाफी नसल्याने भ्रष्टाचार अधिक होईल, असा आरोप भाजप नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी केला होता. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी भाजपला टार्गेट केले. जयंत पाटील म्हणाले की, ‘मंत्रिमंडळ विस्तारावरुन आमच्यात मतभेद नाही. योग्यवेळी तारीख ठरेल. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री तारीख जाहीर करणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल. कॉंग्रेसची यादी आली नाही. त्यांची चर्चा दिल्लीत होते. ती यादी आली की मंत्रिमंडळ विस्तार होईल.’
जयंत पाटील पुढे म्हणाले की, ‘एनआरसी कायद्यासाठी डिटेशन सेंटर जर भाजपने उभे करण्याचा प्रयत्न केला असेल तर ते रद्द करु. असे डिटेंशन सेंटर उभे केले जाणार नाही. पण कोणी कोणास मारहाण करु नये. त्याचं समर्थन होऊ शकत नाही. त्याचवेळी सोशल मीडियावर ट्रोल करताना भाषा व्यवस्थित आणि जपून वापरली पाहिजे,’ असे त्यांनी आवाहन केले आहे.