बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यात अनेक दिवसांच्या सत्ता संघर्षणानंतर अखेर महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. राजकीय वातावरण जवळपास शांत झाले असताना आता एका नवीन चर्चेला उधाण आले आहे. भाजपाचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती. चिखलीकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याने अजित पवार आणि त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. परंतु या चर्चांवर स्पष्टीकरण देत अजित पवार म्हणाले कि, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, त्यांची भेट ही सदिच्छा भेट होती, असं म्हणत राजकीय अंदाजांवर पूर्णविराम दिला आहे.“राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो.
चिखलीखर आणि माझी भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा करण्यात झालेली नाही. चिखलीकर यांना नांदेडला जायचं होतं. त्यामुळे त्यांनी सकाळी लवकर भेट घेतली, दरम्यान , चिखलीकर यांची शुक्रवारीच भेट होणार होती. परंतु काही महत्त्वाच्या कामांमुळे काल आमची भेट होऊ शकली नाही. भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसून कोणताही गैरसमज होऊन देऊ नका,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, यावेळी महाविकासआघाडी बहुमत सिद्ध करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलेला १७० चा आकडा आम्ही नक्कीच गाठू. आम्हाला जे लोक पाठिंबा देणार आहेत, ते आम्हाला देतील. जे दुसऱ्यांना देणार आहेत ते त्यांना देतील. बहुमतासाठी कोणीही कोणाच्या संपर्कात नाही,” असंही अजित पवार यांनी संगितले. तसंच उपमुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
Visit : bahujannama.com