मुंबई बहुजननामा ऑनलाईन – काल रात्री माझं जीभ आणि गळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. काही दिवस बोलू नका असं मला डॉक्टरांनी सांगितलं. मग म्हटलं सध्याचं राजकारण पाहता मी आजच्या कार्यक्रमाला गेलो नाही तर पत्रकार छापतील की मी गिरीश महाजन यांच्यासोबत अमित शहा यांना भेटायला गेलो. म्हणून जरा त्रास झाला तरी मी आलो. असा चिमटा शरद पवार यांनी सध्याच्या पक्षांतराबाबत काढला. क़ॉंग्रेस नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लिहीलेल्या विधानगाथा या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आज विधान भवनात हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर उपस्थित होते. मात्र शरद पवारांनी असा चिमटा काढताच कार्यक्रमात एकच हशा पिकला.
शरद पवार या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, मी पहिल्यांदा सभागृहात गेलो तेव्हा भाषण ऐकायला. सभागृहात पायावर पाय ठेवून बसू शकत नाही. असा नियम आहे. चुकून मी दुसऱ्यांदा पायावर पाय ठेवला तेव्हा मला मार्शलने पकडून बाहेर काढलं होतं. त्यावेळी मी त्याला म्हटलं होतं की आता जातोय पण नंतर येईन तर कायमचा. त्यानंतर राज्यात २६ वर्ष आणि देशात २५ वर्ष सभागृहात काम करण्याची संधी मिळाली. सध्या सभागृहात वेगळेच पायंडे पाडले जात आहेत. माझ्या संसदिय आणि विधीमंडळातील कार्यकाळात कधीही माझा बाक सोडला नाही. संसदेची गरीमा सांभाळली. त्याची काळजी घेतली. मात्र दुर्देवाने आता तसे होताना दिसत नाही.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनीही आपल्या आठवणी सांगितल्या. मी सुरुवातीच्या काळात राज्यमंत्री होतो. पवार साहेब तुम्ही प्रश्न विचारला. तुम्ही सांभाळून घेतलं म्हणून हे पुस्तक मी लिहू शकलो. मी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो. तेव्हा लगेच पेपर, टिव्हीत बातम्या आल्या, विधानगाथा गाजली. गेली पाच वर्षे निवांत वेळ मिळाला म्हणून हे पुस्तक मी लिहू शकलो. मात्र पुढे तसा वेळ मिळू नये अशी मी विनंती करतो.