बहुजननामा ऑनलाइन : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला आहे. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते भाजप -शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यात आता राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीदेखील विधानसभा निवडणुकीआधी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. दोन दिवसात पक्षांतर करणार असल्याचे भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत जाहीर केले.
दरम्यान भास्कर जाधव यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ठ केल्याने जाधव यांचा सेना प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. चिपळूणमध्ये घेतलेल्या बैठकीत भास्कर जाधव यांची कार्यकर्त्यांना माहिती दिली आहे. तसेच आपल्याबरोबर येतील त्यांना सोबत घेऊ, जे येणार नाहीत त्यांच्याबद्दल नाराजी नसेल, अशी प्रतिक्रियादेखील भास्कर जाधव यांनी दिली आहे. परंतु भास्कर जाधव यांच्या पक्षांतराच्या निर्णयाने त्यांचे अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत , शिवबंधन हाती घेतले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर टीका करत भास्करराव जाधव यांनी सांगितले कि, ‘मी याआधीच पक्षाकडे मुंबईचं अध्यक्षपद मागितलं होतं. पण पक्षाने तेव्हा माझं ऐकलं नाही,’ असं म्हणत भास्कर यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण त्यानंतर आता भास्कर जाधव स्वत:च पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. कोकणातील दोन बडे नेते भास्कर जाधव आणि नारायण राणे या दोघांमध्ये सतत राजकीय संघर्ष सुरु असतो. भास्कर जाधव हे शिवसेनेच्या संपर्कात असून नुकतीच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी भास्कर जाधवांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राणेंना कोकणात शह देण्यासाठी शिवसेनेला मदत होऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे.