बहुजननामा ऑनलाईन
दर 3 वर्षांनी येणारा आणि अधिकस्य अधिक फलम देणारा अधिक मास 16 ऑक्टोबर रोजी समाप्त होणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 17 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. दरवर्षी पितृपक्षापाठोपाठ नवरात्र होते. मात्र यंदा अश्विन अधिक मास आल्यानं नवरात्र पुढं सरकली. ती आता 17 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 25 ऑक्टोबरला समाप्त होईल. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जाणारा दसरा 26 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.
नवरात्र, दिवाळी यंदा उशीरा आली. तरी वातावरणात दरवर्षीप्रमाणे ऋतुचक्रातील बदल जाणवू लागले आहेत. अशातच कार्तिक पौर्णिमेपर्यंत अनेक मोठे पर्व येणार आहेत. त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
16 ऑक्टोबर रोजी अधिक मास समाप्त होणार आहे. तो दिवस आहे अमावस्येचा. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला घरोघरी घटस्थापना केली जाणार आहे. या दिवशी तुला संक्रांतदेखील आहे. सूर्य कन्या राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे.
24 ऑक्टोबर रोजी महाष्टमी आहे. अनेक ठिकाणी या दिवशी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. मुखवट्याच्या महालक्ष्मीची पूजा केली जाते. 25 ऑक्टोबरला दुर्गानवमी अर्थात नवरात्रीचा शेवटचा दिवस असणार आहे.
26 ऑक्टोबर रोजी दसरा हा सण आहे. यंदा घरोघरी जाऊन सोन्याची लयलूट करता आली नाही तरी आपट्याची पानं घरी आणून श्रीराम विजयोत्सव आनंद घरी राहून साजरा करावा लागणार आहे.
30 ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमा आहे. त्यालाच आपण कोजागिरी पौर्णिमा असंही म्हणतो. देवी लक्ष्मी या दिवशी कोssजागरति असं विचारत देह, बुद्धी, मन आणि जबाबदारीनं जागृत असणाऱ्या भक्तांना आशीर्वाद देते.
12 नोव्हेंबरपासून दिवाळीची सुरुवात वसुबारसनं होणा आहे. 13 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी असणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी दीपावलीचे अभ्यंग स्नान अर्थात नरक चतुर्दशी असणार आहे. त्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील आहे. तर 16 ऑक्टोबर रोजी भाऊबीज असणार आहे.
दीपावलीचा आनंद आणि अवघ्या 10 दिवसांवर कार्तिकी एकदशीचा सोहळा आहे. यंदा वारीचा आनंद घेता येणार नाही. तरी विठुरायाचे स्मरण करण्याचा दिवस, 25 नोव्हेंबर प्रबोधिनी एकादशीचा असणार आहे.
या सर्व उत्सव पर्वांची सांगता 30 नोव्हेंबर रोजी त्रिपुरा पौर्णिमेनं होणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा सर्व आसमंत दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघेल आणि वातावरणात सकारात्मक पसरेल.