मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात शेतकरी, कामगार आणि फुले-शाहू आंबेडकरी विचारांचे पक्ष तसेच संघटनां एकत्र येऊन राष्ट्रीय बहुजन आघाडी लोकसभेच्या मैदानात उतरवली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची लोकसभा निवडणुकीसाठी ताळमेळ जमला नाही. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. असे आघाडीचे प्रमुख डॉ. सुरेश माने यांनी म्हंटले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्हीही पक्ष राज्यातील इतर नवीन पक्षांना या निवडणुकीत सामावून घेतील असे वाटत होते. परंतु, तसे होताना दिसत नाही. तर दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर हे आपल्या वंचित आघाडीत इतर वंचित आणि नवीन घटकांना स्थान देत नाहीत. यामुळे आम्ही राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या प्रमुख नेतृत्वाखाली भाजप-सेना सोबतच बिगर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे अनेक पक्ष आणि संघटना सामील झाल्या आहेत. यामुळे या राष्ट्रीय बहुजन आघाडीकडून राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर निवडणूक लढविणार आहे. असे आघाडीचे प्रमुख डॉ. सुरेश माने यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे, राज्यात विदर्भवादी मंचासह अनेक पक्ष संघटनांची मिळून ही आघाडी बनली आहे. त्यामुळे ३ मार्च रोजी या निवडणुकीच्या उमेदवार आणि त्यांच्या प्रचारासाठी नागपुरातील कस्तुरी पार्क मैदानात भव्य सत्ता परिवर्तन रॅलीने याची सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.