नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्यानंतर विरहाच्या विचाराने प्रेमीयुगलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कामारवाडी (ता. हिमायतनगर) येथे शनिवारी (दि. 23) ही धक्कादायक घटना घडली आहे. एकाच चितेवर दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले.
अविवाहित तरुण दत्ता भिंगोरे (24) आणि विवाहित शारदा माने ( 25) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता भिंगोरे हा अविवाहीत होता तर शारदा माने ही विवाहित होती. गेल्या काही वर्षापासून या दोघांचे प्रेमसंबध होते. पतीशी पटत नसल्यामुळे शारदा ही गेल्या 4 वर्षांपासून मामाकडे कामारवाडी येथे वास्तव्याला होती. याच ठिकाणी दोघांचे सूत जुळले होते. परंतु दोघांच्या संबंधांची कुणकुण नातेवाईकांना लागली होती. शारदा ही विवाहित असल्यामुळे भिंगोरे यांच्या कुटुंबीयांनी प्रेमसंबंधाला विराेध दर्शविला. तसेच दत्ताच्या घरच्या मंडळींनी त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. परंतु दत्ताने शारदासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. पण कुटुंबीयांनी लग्नास विरोध केल्याने दोघांनी गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला. या घटनेने परसिरात हळहळ व्यक्त होत आहे.