लातूर : बहुजननामा ऑनलाइन – मुस्लिम समाजाला शैक्षणिक, नोकरी आणि राजकीय क्षेत्रांमध्ये आरक्षण व संरक्षण द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र जनएकता संघटना व सर्व मुस्लिम समाजातर्फे गंजगोलाई ते तहसील कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरी आणि राजकीय क्षेत्रांमध्ये आरक्षण मिळावे, ही गेल्या अनेक वर्षांपासून लातूरसह महाराष्ट्रातील मुस्लिम समाजबांधव मागणी करीत आहेत. मागील सरकारने मुस्लिम समाजाला ५ टक्के शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण दिले होते. परंतु, काही मंडळी मुस्लिम आरक्षण विरोधात न्यायालयात गेले होते. ५ टक्के शैक्षणिक आरक्षण द्यावे, असे न्यायालयाने सरकारला आदेश दिले होते. पण सरकारने मुस्लिम समाजास आरक्षण दिले नाही. त्याचप्रमाणे मुस्लिम समाज व समाजातील काही घटक अतिमागासलेले असून त्यांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण व संरक्षण मिळावे आदींसह अन्य विविध बाबींच्या शिफारसी सच्चर कमिटी, रंगनाथ मिश्रा कमिटी, महेमूद – उर – रहेमान कमिटी या कमिटींनी अहवालाद्वारे शासनाकडे केली आहे. परंतु, या अहवालाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
त्यामुळे अतिमागासलेला मुस्लिम समाज शिक्षण व नोकऱ्यांमध्ये अल्पप्रमाणावर दिसून येत आहे. सरकारने मराठा समाजास १६ टक्के आरक्षण दिले आहे. त्याबद्दल अभिनंदन. या निर्णयाचे मुस्लिम समाज स्वागतच करतो. मराठा समाजाच्या धर्तीवर मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरी आणि राजकीय आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सर्व मुस्लिम समाजातर्फे महाराष्ट्र जनएकता संघटनेच्यावतीने गंजगोलाईतून तहसील कार्यालयापर्यंत हातात फलक घेऊन मूकमोर्चा काढण्यात आला. यामोर्चास अनेक पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला. तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचताच सभेत रुपांतर झाले. यावेळी समाजातील अनेकांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.