बहुजननामा ऑनलाइन – मुंबईसारख्या शहराला कमी वेळात अतिवृष्टी होणं आणि त्याच वेळी समुद्राला भरती येणं हा योग काही नवीन नाही. त्याचाही दुष्परिणाम सखल जलमय होण्यात होत असतो. तरीही मुंबईच्या नावानं काव काव करणारे काही डोमकावळे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणारे विरोधक बोंबा मारणं सुरूच ठेवतात. हेच लोक नागपूर, अहमदाबाद जलमय होतं तेव्हा मात्र गप्प असतात अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं मुबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. घरं, हॉस्पिटल आणि, ऑफिसेसमध्ये पाणी गेलं आहे. यावरून विरोधकांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेनं त्याला सामनातून प्रत्युत्तर दिलं आहे. रेकॉर्डब्रेक पाऊस आणि मुंबईच्या भौगोलिक स्थानामुळं ही स्थिती निर्माण झाली आहे असा सूर शिवसेनेनं लावला आहे.
शिवसेनेनं म्हटलं आहे की, मुंबई पावसानं जलमय होऊ नये याचा काळजी घेतलीच पाहिजे, तशी ती घेतली जातच असते. परंतु 24 तासात जर अडीच दशकातील विक्रमी पाऊस कोसळत असेल तर कसं होणार. मागील काही वर्षात मुबईच्या पावसानंही मूड बदलला आहे. कधी तो 24 तासात विक्रमी प्रमाणात पडतो तर कधी महिन्याच्या पावसाची सरासरी 2-3 दिवसात पूर्ण करून मोकळा होतो. याही वर्षी जुलै, ऑगस्ट आणि आता तेच तेच घडलं आहे. 1994 ते 2020 या काळात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस मुंबईत कधीच झाला नव्हता.
शिवसेना म्हणते, प्रत्येक पावसाळ्यात मुसळधार पावसानं मुंबईचे काही भाग जलमय होतात, त्याचा परिणाम जनजीवनावर आणि वाहतुकीवर होतो. अशा स्थितीत महापालिका कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन आपलं कर्तव्य चोखपणे बजावत असतात. अशा वेळी त्यांच्याविरूद्ध बोंब मारणे म्हणजे या सर्व यंत्रणांचा अपमान केल्यासारखंच आहे.
सव्वा कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या महानगरीचे चलनवलन फक्त एकट्या महापालिकेच्या हातात नाही. इतर सरकारी यंत्रणांकडे मुंबईच्य वेगवेगळ्या कामांची जबाबदारी आहे. अशा सर्व यंत्रणांनीही जबाबदारी सांभाळायला हवी अंस म्हणत शिवसेनेनं रेल्वे आणि इतर केंद्रीय यंत्रणांकडेही बोट दाखवलं आहे.