मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक सेवा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत होत आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व इंटरसिटी एक्सप्रेससह लांब पल्ल्याच्या बहुतांश गाड्या आजपासून नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांची सुरु असणारी गैरसोय आता थांबणार आहे.
या मार्गावर सर्व इंटरसिटी एक्सप्रेस आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्या शुक्रवारपासून रविवारपर्यंत सुरु करण्यात आल्या होत्या. आजची वाहतूक स्थिती जरी स्पष्ट नसली तरी गेल्या तीन दिवसांपासून ही सेवा सुरळीत सुरु असून ती पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यावेळी कर्जत ते लोणावळा भागात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. इतकेच नाही तर पावसामुळे पाणी साचल्याने रेल्वे मार्गांचंही मोठं नुकसान झालं होतं. यानंतर प्रशासनाने या सर्व ठिकाणच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं होतं. त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. इतकेच नाही तर गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले होते.