मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्याच्या तपासासाठी एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकाचे प्रमुख पोलीस उपायुक्त असणार आहेत. या घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांसह एकूण 76 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान या घोटाळ्या प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर या प्रकरणी सोमवारी (दि 26 ऑगस्ट) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपपत्रात उल्लेख आहे की, या घोटाळ्यामुळेच 1 जानेवारी 2007 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत सरकारी तिजोरीला 25 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. याशिवाय या घोटाळ्यात अनेक पक्षांचे नेते आरोपी आहेत.
अजित पवार आणि संचालक मंडळाची सुप्रीम कोर्टात धाव
या सर्व प्रकरणानंतर आता संचालक मंडळ आणि अजित पवार यांनी सु्प्रीम कोर्टात धाव घेतली. सदर नेत्यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थिगिती देण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
शरद पवारांवरही होऊ शकतो गुन्हा दाखल
तक्रादाराचे वकिल माधवी अयप्पन यांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. जर असं झालं तर शरद पवार यांच्यावर एखाद्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असेल. अय्यपन यांनी अशी शक्यता वर्तवली आहे की, या प्रकरणातील आरोपींचा आकडा हा 300 च्या घरात जाऊ शकतो. दरम्यान याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही कारवाई म्हणजे सूडाचं राजकारण असल्याचं म्हटलं आहे.