मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. राज्यातील सर्वात लोकसंख्या असलेले शहर मुंबईत कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या स्थितीवरून राज्यात काही प्रमाणात निर्बंध लागू केले आहे. तर मुंबईच्या लॉकडाउनबाबत अनेक चर्चा सुरु असताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
अस्लम शेख पत्रकारांशी बोलताना म्हणाले, लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण लॉकडाउन उठवला आहे. पुन्हा लॉकडाउन लावण्याच्या मनस्थितीत आपण नाही. पण आवाहन आपण करत राहतोय, लोकांना हे टाळू शकतो असं सांगत आहोत. परंतु जर लोकांचा जीव वाचवायचा की त्यांचा व्यवसाय, उत्पन्न वाचवायचं अशी परिस्थिती आली तर लोकांचा जीव कसा वाचवता येईल या मानसिकतेने सरकार प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले. तर लोकलच्या प्रश्नावर म्हणाले, टास्क फोर्स ज्यापद्धतीने सूचना कऱणार त्याप्रकारे निर्णय घेतला जाईल. मुंबईत दिवसाहीतील निर्बंधाबाबत म्हणाले, मार्केट्स असतील, शॉपिंग मॉल किंवा किराणाची दुकानं जिथे लोक गर्दी करत आहेत तिथे बंधनं लावण्यात येऊ शकतात. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये असंच करण्यात आलं आहे. खऱेदीसाठी वैगेर वेळ देण्यात आली आहे. असे शेख यांनी सांगितलं.
लॉकडाउनबाबत मुख्यमंत्र्यांचं भाष्य आणि राष्ट्रवादीचा विरोध यावर शेख म्हणाले, मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीने जे काही सांगितलं ते काही दुमत नाही. तुम्ही लॉकडाउनसाठी तयार राहा असं मुख्यमंत्री सांगत असून राष्ट्रवादी गरज नाही म्हणत आहे. तयारीत राहा म्हणजे लावणार असं नाही, तुम्ही जगात कुठेही पहा. आजही अमेरिकेतही अनेक ठिकाणी लॉकडाउन सुरु आहे. लंडनमध्ये २ महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला लॉकडाउन उठवलेला नाही. युरोप, स्पेनमध्ये, इटली येथेही पहा, काही ठिकाणी लॉकडाउन उठवण्यात आला आहे, तर काही ठिकाणी २४ तासांचा लॉकडाउन सुरु आहे, असे अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रुग्ण संख्येवरून ICMR ला मुंबई आणि महाराष्ट्रातच रुग्ण का वाढत आहेत यासंबंधी लिहिलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात रुग्ण वाढणं चिंताजनक आहे, परंतु इथेच का वाढत आहे? पश्चिम बंगालमध्ये पूर्ण जोराने प्रचार सुरु आहे, लाखोंच्या संख्येने लोक जमत आहेत. केरळमध्ये हीच परस्थिती आहे,” अशी शंका अस्लम शेख यांनी उपस्थित केली. तर १६ हजारापेक्षा अधिक बेड महापालिकेकडे आहेत. त्यामधील अजून ४ हजार बेड शिल्लक आहेत. ICU मध्ये जागा आहे. व्हेटिलेटरमध्ये जागा आहे. खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड राखीव आहेत. तसेच ८० रुग्णालयांना महापालिकेने आपल्या ताब्यात घेतलं आहे. तसेच, लसीकरण योग्य सुरु असून शासनाने अनेक ठिकाणी जम्बो सेंटर सुरु केले आहेत. काही जम्बो सेंटर बंद केले होते, पण गरज लागली तर २४ तासात ते वापरु शकतो अशा तयारीत आहेत. असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले आहे.