नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सांगली आणि कोल्हापूर येथील पूरपरिस्थिती निवळण्याचे नाव घेत नाहीये. अशातच संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरु असून माणुसकीचे अलोट दर्शन होत आहे. अनेक संस्था, तरुणांचे गट आपापल्या परीने शक्य होईल तशी मदत देऊ करत आहेत. अशातच आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सांगली आणि कोल्हापूर येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी आपल्या खासदार निधीतून २५ लाख प्रत्येकी अशी एकूण ५० लाखांची मदत जाहीर केली आहे.
यासंदर्भात माहिती त्यांनी आपल्या ट्विटर हॅन्डल वरून देखील दिली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आठवले यांनी कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील काही पूरग्रस्त भागांना भेटी देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी दोनही जिल्ह्यांना प्रत्येकी २५ हजारांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर मदतीचे आवाहन करताना इतर नेत्यांनीही मदत करावी असे सांगितले.
MoS, Ministry of Social Justice & Empowerment and Rajya Sabha MP from Maharashtra, Ramdas Athawale: I have announced Rs 50 lakh from my Local Area Development Scheme (MPLADS) fund, for Kolhapur and Sangli district. I also urge other MPs and MLAs to help people. #MaharashtraFlood pic.twitter.com/74uX2xOlXM
— ANI (@ANI) August 12, 2019
काय म्हणाले आठवले :
परिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी येथील आपत्तीग्रस्त जनतेला आर्थिक मदतीबरोबरच सामाजिक आणि मानसिक मदतीची देखील आवश्यकता असल्याचे म्हटले. पंतप्रधान आवास योजना आणि रमाई घरकूल योजनेंतर्गत संबंधित बाधितांचे पुनर्वसन करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून जनतेला लाभदायी तोडगा काढू असेही ते म्हणाले. तसेच अशा प्रकारे पूरप्रलय टाळण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर नदीजोड प्रकल्प राबवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु असे देखील त्यांनी सांगितले.