बहुजननामा ऑनलाईन – वर्ध्यात दोन लहान मुलांसह आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तम वर्धा स्टील कॉलनीत हा प्रकार घडला असून परिसरात लहान मुलांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मात्र ही महिलेने नक्की कोणत्या कारणावरुन आत्महत्या केली हे अद्याप समजलेले नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचा दरवाजा बराच वेळ बंद असल्याचे शेजाऱ्यांना लक्षात आले. त्यावेळी त्यांनी पोलीसांना याबाबत माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी पोहचून घराचा दरवाजा तोडला.त्यावेळी त्यांना घरात या तिघाचे मृतदेह आढळून आले. महिलेने घराची दारे खिडक्या लावून गळफास घेतला, यावेळी तिची दोन लहान मुलेही घरीच होती. दारे खिडक्या बंद असल्यामुळे त्या चिमुकल्यांचाही गुदमरुन मृत्यू झाला. सविता आशिष साहू (३१), आयुष आशिष साहू (३), ओरा आशिष साहू (९) अशी मृतांची नाव आहेत.
महिलेचा गळफास घेऊन तर मुलांचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. या तिघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार पुढील तपासाची दिशा ठरविण्यात येईल असे पोलीसांनी सांगितले आहे. तर सविता यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला याचा तपास करण्यासाठी साहू कुटुंबियांची आणि शेजाऱ्यांची चौकशी होणार असल्याचं पोलिसांकडून सांगितल आहे.