नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप तारखांची घोषणा केली नसली तरी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र निवडणुका कधी होतील याबाबत माहिती दिली आहे. 12 सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार असून 15 ऑक्टोबर दरम्यान निवडणूक होईल असे त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय 288 जागांवर तयारी सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं. इतकेच नाही तर 2014 मध्येही याच काळात निवडणूक झाली होती अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार जंबो निर्णय घेताना दिसत आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी 25 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
गणेशोत्सवानंतर कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याआधीच लोकप्रिय निर्णय घेण्यावर सरकारचा भर असून या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या किमान 3 बैठका होणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारने मिशन मंगल हा सिनेमा कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलावंताच्या मानधनातही दीडपटीने वाढ करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे.