बहुजननामा ऑनलाइन टीम –भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकनाथ खडसे यांनी तोफ देखील डागली आहे.
देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करु शकत नाहीत. कारण मुहुर्त साधत लग्न करुन शपथ घेत तीन चार दिवस संसार करत ते मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री झाले होते. तीन-चार दिवस दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर पतिव्रता आहोत, असं आम्ही म्हणू शकत नाही. कारण आता नैतिकता घालवली गेली आहे, अशा परखड शब्दांत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस एकटेच लढत असून महाराष्ट्रभर फिरत आहेत. पूर्वी आमचं टीम वर्क होतं. त्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकीर, नितीन गडकरी यांच्या तोफ चालायच्या तर अलीकडे माझ्यासह पंकजा मुंडे, गिरीश बापट, विनोद तावडे, हरिभाऊ बागडे असा आमचा एकत्र ताफा होता. त्यामुळे सरकार घाबरुन गांगारुन जायचं. मात्र, आता महाराष्ट्रातील सर्व नते मंडळी शांत बसली आहेत. जनतेनं निवडून दिलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते अधून मधून बोलतात. मात्र, जी आक्रमक भाषा पाहिजे ती त्यांच्यात कुठेच दिसत नाही, आम्ही कमी पडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला होता. महाविकास आघाडीचे सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडून द्या, अशा शब्दात त्यांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले होते. आघाडी सरकारमध्ये एक-दीड वर्षात उलथापालथ होईल, असं वाटतं नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्याकडे आवश्यक संख्याबळ आहे, त्यामुळे हे सरकार पडेल, ही आशा करणं सोडावी, असा सल्ला त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना दिला होता.