औसा : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लातूरमधील औसा येथे झालेल्या सभेमध्ये बालाकोटमधील हवाई हल्ल्यासंदर्भात मत मागितल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान हे आचारसंहितेचा भंग करणारे आहे, असे उस्मानाबाद जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले असल्याचे वृत्त आहे.
मोदी यांची लातूरमधील औसा येथे प्रचार सभा आयोजित केली होती ‘निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी आपले मत बालाकोटमध्ये हल्ला करणाऱ्यांना आणि पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना समर्पित करावे,’ असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. राजकीय फायद्यासाठी सुरक्षा दलांचा वापर करता येणार नाही, अश्या सूचना निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिल्या आहेत. त्यामुळे या विधानामुळे आचारसंहितेचा भंग असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आयोगातील सूत्रांनी याबाबत माहिती दिली असून, कोणत्याही अधिकाऱ्याने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र मुख्य निर्णय अधिकारी (सीईओ) यांना याबाबत अहवाल पाठविला आहे. राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर आपली प्रतिक्रिया जोडून तो अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. यावर आता अंतिम निर्णय आयोग घेईल, असे वृत्तात म्हटले आहे.