कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – मोदी सरकारच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेल्याने माज आलेल्या सरकारला या निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी, कागल येथे झालेल्या जाहीर सभेत केले. महाराष्ट्रात हसन मुश्रीफ हे एक नंबरचे आमदार असून, या नेत्याच्या शब्दाशी वफादार रहा. चुकीच्या मार्गाने आपण जाऊ नये, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
आगामी लोकसभेसाठी महाआघाडीचे उमेदवार खा. धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ कागल येथील गैबी चौकात गुरुवारी जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत खा. पवार यांनी भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले, पुढच्या पिढीवर परिणाम करणारी ही महत्त्वाची निवडणूक आहे. त्यामुळे ज्या प्रवृत्तीचे सरकार सध्या सत्तेवर आहे, त्या प्रवृत्तीच्या हातात पुन्हा सत्ता दिली, तर त्याची किंमत मोजण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. आज दुष्काळाचे संकट मोठे आहे, पाण्याचे संकट आहे, जनावरांना चारा नाही, पिके करपली आहेत, त्यामुळे शेतकर्यांचा चेहराही सुकला आहे. तरीदेखील हे सरकार शेतकर्यांकडे पहात नाही. परिणामी शेतकर्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत. ११ हजार शेतकर्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. शेतकर्यांची कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्याला मदत करण्याची भूमिका सरकार घेत नाही. उलट भाजपचे नेते शेतकर्यांबाबत अपशब्द वापरतात. शेतीमालाला भाव वाढवत नाहीत. आम्ही वाढवले त्याला विरोध केला. ८०टक्के जनतेला अन्नधान्य पुरविण्यासाठी २० टक्के शेतकरी मेहनत करतो. त्याच्या मेहनतीला दाम मिळायला नको का? बळीराजा जगला पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
खा. पवार पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचाही त्यांचा डाव आहे. घटनेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, तर हे सरकार जनता उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी विस्तवाशी खेळण्याचा प्रयत्न करू नये, असा त्यांना आपला सल्ला आहे. रिझर्व्ह बँक, न्यायसंस्था यासारख्या संविधानिक संस्थांपैकी कोणीही समाधानी नाही. देशात हुकूमशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडण्याची वेळ या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे.
लोकांना खोटे अश्वासन देण्याशिवाय या सरकारने काही केलेले नाही. धनगर समाज, मराठा समाज यांना अजूनही आरक्षण मिळाले नाही. मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी हे लोक करत नाहीत. काळा पैसा आणला नाही, तर चौकात फाशी द्या, राम मंदिर बांधले नाही तर मी संन्यास घेईन, गंगा नदी साफ केली नाही, तर जलसमाधी घेईन, अशा घोषणा सत्ताधार्यांनी केल्या होत्या. प्रत्यक्षात यातील काहीच झाले नाही. मूठभर लोकांच्या हितासाठी सत्ता हवी असणार्यांना लोकांना त्यांची जागा लोक दाखवून देतील .