बहुजननामा ऑनलाईन टीम : एअरसेल आणि डिशनेट वायरलेस वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे, कारण ३१ ऑक्टोबरनंतर या यूजर्सचा मोबाइल क्रमांक बंद होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तुम्हाला जर ह्या नंबरची सेवा सुरु ठेवायची असेल तर तुम्हाला ३१ ऑक्टोबरपूर्वी आपला क्रमांक दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सवर पोर्ट करणे गरजेचे आहे. सध्या ७ कोटी ग्राहक या कंपन्यांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे दिलेल्या तारखेपूर्वी मोबाइल क्रमांक पोर्ट न केल्यास तुमचा क्रमांक कायमचा बंद होणार असल्याची माहिती ट्रायने दिली आहे.
दरम्यान रिलायन्स जिओ कंपनीच्या एन्ट्रीने इतर कंपन्यांना मोठा फटका बसला असून काही कंपन्या बंदही झाल्या होत्या. त्यात एअरसेलनं २०१८ च्या सुरूवातीला आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एअरसेलनं ट्रायची मदत मागितली होती. त्यानंतर कंपनीनं आपल्या युजर्ससाठी युनिक पोर्टिंग कोडची सुविधा दिली होती. पंरतु आता ट्रायनं दिलेल्या माहितीनुसार एअरसेलची ही सेवा देखील ३१ ऑक्टोबरनंतर संपुष्टात येणार आहे. ज्यामुळे मोबाइल क्रमांक कायमचा बंद होणार आहे.
एअरसेलने २०१८ मध्ये ज्यावेळी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी कंपनीकडे तब्बल ९ कोटी ग्राहक होते. त्यानंतर २८ फेब्रुवारी ते ३१ ऑगस्ट या कालावधीत केवळ १.९ कोटी ग्राहकांनीच आपले क्रमांक पोर्ट केले, तर ७ कोटी ग्राहक अजूनही एअरसेलचीच सेवा वापरत असल्याची माहिती ट्रायने दिली आहे. तसेच सेवा बंद करण्यापूर्वी अनिल अंबानी यांच्या आरकॉममध्ये आपली कंपनी मर्ज करण्याचा प्रयत्न देखील कंपनीने केला होता. परंतु काही तांत्रिक कारणामुळे ते शक्य झालं नव्हतं. मिळालेल्या माहितीनुसार एअरसेल आणि वायरलेस डिशनेटचे ग्राहक आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, आसाम, बिहार, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, कोलकाता, मुंबई, नॉर्थ ईस्ट, ओदिशा, पंजाब, राजस्थान, तामिलनाडू, उत्तर प्रदेश (पूर्व) आणि पश्चिम बंगाल सर्कलमध्ये आहे. एअरसेलच्या ग्राहकांना २ जी आणि ३जी नेटवर्क मॅन्युअली सिलेक्ट करून सेवेचा लाभ घेता येणार आहे. मॅन्युअली नेटवर्क सिलेक्ट न केल्यास फोनवर नेटवर्क दिसणार नसल्याचे समजले आहे.
Visit : bahujannama.com