बहुजननामा ऑनलाइन टीम – बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला ७४ जागांवर विजय मिळाल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढलेल्या जागांसाठी भाजपचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची रणनीती(Mission Mumbai) कारणीभूत असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. दरम्यान, बिहार निकालानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी महापालिका निवडणुकांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
मुंबई महापालिकेवर वर्षानुवर्षे शिवसेनेचा झेंडा आहे. पालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. पण मागील निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यात शिवसेनेचे ९२ तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले. मात्र, राज्यात सत्तेत एकत्र असल्याने भाजपने मुंबईत महापौर बसवण्याचा प्रयत्न केला नाही. शिवाय, ८२ नगरसेवक असूनही विरोधी पक्षनेतेपदावर भाजपने दावा केला नाही.
तथापि, आता राज्यातील राजकीय गणिते बदलली असून, शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आणि इतक्या जागा जिंकूनही भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागले. शिवसेनेचा हा वर भाजपच्या जिव्हारी लागला असून, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने ‘मिशन मुंबई’ हाती घेतले आहे. त्यासाठी आज मुंबईत भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे.
मुंबईतील भाजपची संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार असून, बैठकीला मुंबईतील भाजप नगरसेवक, पदाधिकारी, आमदार आणि खासदार उपस्थितीत राहणार आहेत. या बैठकीत शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजप रणनीती आखणार आहे.